मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. १८ नोव्हेंबर रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तबस्सुम यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्या रुग्णालयातून घरी परतल्या होत्या. मात्र शुक्रवारी पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांना दोनदा हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं, अशी माहिती त्यांचा मुलगा होशांगने दिली.
तबस्सूम यांनी १९७२ ते १९९३ पर्यंत दूरदर्शनवरील ‘फुल खिले हैं गुलशन गुलशन’ या सेलिब्रिटी चॅट शोच्या होस्ट म्हणून काम केलं होतं. त्यांनी २०१४ मध्ये ‘रेडिफ डॉट कॉम’ला एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्यांनी एक आठवण सांगितली होती. अमिताभ बच्चन कधीही शोसाठी टेलिव्हिजन स्टुडिओमध्ये यायचे नाहीत आणि त्याऐवजी ते तबस्सूम यांना चित्रपटांच्या सेटवर बोलवायचे. तेव्हा अमिताभ यांनी त्यांचा जीव कसा वाचवला होता, तो प्रसंग त्यांनी सांगितला होता.
त्या म्हणाल्या होत्या, “मी तुम्हाला अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचा एक प्रसंग सांगेन, ज्याचा ‘फुल खिले’शी काहीही संबंध नाही… मी त्यांच्याबरोबर आणि कल्याणजी-आनंदजींसह भारतात आणि परदेशात अनेक लाइव्ह शो केले आहेत. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात एक घटना घडली होती. तेव्हा माझा पाय फ्रॅक्चर झाल्याने मी व्हीलचेअरवर बसून शो होस्ट करत होते. त्यावेळी तिथे अचानक आग लागली आणि चेंगराचेंगरी झाली. मी व्हीलचेअर होते आणि मदतीसाठी ओरडत होते, पण कोणीच मदत करण्यासाठी पुढे आलं नाही. सर्वजण आपापला जीव वाचवण्यासाठी धावत होते. तेवढ्यात अमितजी आले. त्यांनी मला तिथून सुरक्षित ठिकाणी नेले. आज मी त्याच्यामुळेच जिवंत आहे,” असं तबस्सुम यांनी सांगितलं होतं.

